धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने १ मे रोजी आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ््यात १४ जोडपी विवाहबध्द झाली. सर्वसामान्यांना दिलासा देणा-या सामुदायिक विवाह सोहळ््याची राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत हा सोहळा पार पडला. धर्मदाय कार्यालये, संस्था, देणगीदार अन विवाह समितीने हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला.
जिल्ह्यातील धर्मदाय संस्थांच्या सहयोगाने धर्मदाय आयुक्त कार्यालय सामुदायिक विवाह समितीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ््याचे ओम गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. दानशुरांनी या सोहळ्यासाठी देणगी दिली. अंध निलेश शिंदे व अंध राणी वाघमारे सह विविध जाती धर्मातील १४ जोडप्यांचा विधीपुर्वक विवाह उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यास अहमदनगर पोलिस बँण्ड पथकाने वधु – वरांच्या मिरवणुकीत आपली सेवा दिली.
यावेळी ह.भ.प.भास्करगिरी महाराज, अरुणगीरी महाराज, धर्मदाय उपायुक्त हिरा शेळके, जनार्दन स्वामी ट्रस्टचे मोहन चव्हाण, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अॅड.पांडुरंग गायकवाड, स्नेहालयचे सुवालाल शिंगी, माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख छायाताई फिरोदिया, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख आदि उपस्थित होते. स्वर्गीय बाळासाहेब पवार स्मृती प्रित्यर्थ ओम गार्डन विनामुल्य उपलब्ध करण्यात आले होते.
विवाह समितीचे मधुकर साळवे, मेहेरनाथ कलचुरी, भास्करराव साबळे, ज्योती मरकड, दीपक दरंदले, नरेंद्र फिरोदीया, कैलास जाधव, गंगाराम बेलकर, उत्तमराव करपे यांनी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.
