प्रेमप्रकरणातून तरुणाची शेंदूर फासून गावभर धिंड

प्रेमप्रकरणातून तरुणाची शेंदूर फासून गावभर धिंड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) तालुक्यातील आर्वी येथील ही घटना आहे.  प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या आरोपातून मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचे कपडे फाडले आणि त्याला गुलाल-शेंदूर फासून गावभर त्याची धिंड काढली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणाची सुटका करुन घेतली.

आर्वी येथील 25 वर्षीय तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही 25 एप्रिलला बाईकवरुन औरंगाबादला पळून गेले. यानंतर दोघंही  पुणे, कोल्हापूर, पुणे आणि पुन्हा औरंगाबाद असे फिरले. 29 एप्रिलला हे दोघे औरंगाबादमध्ये नक्षत्रवाडी येथील मित्राच्या घरी थांबले. याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. तिचे कुटुंबीय तेथे पोहोचले आणि दोघांना घेऊन औरंगाबादबाहेर आणले. यावेळी त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली.

तरुणाला शेतातील झाडाला बांधून त्याला मारहाण केली. शिवाय, रात्रभर त्याला त्याच अवस्थेत ठेवले गेलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तरुणाला आर्वी-निमगाव रस्त्यावरील पुलावर आणण्यात आले. तेथे त्याचे कपडे काढून त्याच्या अंगावर गुलाल, शेंदूर फासून त्याची गावातून धिंड काढली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणाची सुटका केली. तरुणाच्या तक्रारीवरुन 62 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *