कर्जबाजारी शेतकऱ्याची कर्जतमध्ये आत्महत्या

कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने सेवा संस्था व खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, सात वर्षे वयाची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी, कर्जत तालुक्यातील शिंदा येथे दत्तात्रय देवराव घालमे यांच्याकडे त्यांचा पुतण्या शरद सोमवारी (१६ एप्रिल) रात्री ९ वाजता आला होता. ते अस्वस्थ दिसल्याने त्याने, ‘काका तुला काय होत आहे?’ असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, ‘मला एक तर जमीन कमी आहे, यामध्ये फार काही पिकत नाही आणि जे पिकते त्याला भाव नाही. माझ्यावर सेवा सोसायटीचे एक लाखापेक्षा जास्त आणि खासगी सावकाराचे दीडलाख कर्ज आहे. शेतामधून मिळणाऱ्या उत्पादनामधून मी सर्वांचे निट पोटही भरू शकत नाही. तर कर्ज कसे फेडणार? यामुळे मी कंटाळून विष पिलो आहे. आता मी जिवंत राहणार नाही’, असे म्हणातच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे शासकीय रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी दत्तात्रय यास मृत घोषित केले, अशी माहिती बंडू घालमे याने दिली. संबंधित कुटुंबाला सरकारने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *