लष्कराने बंद केलेला दापोडी-बोपखेल रस्ता पूर्ववत खुला करावा, या मागणीसाठी बोपखेलवासीयांनी गुरुवारी सकाळी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर ग्रामस्थांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. दुपारी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की होऊन अक्षरश: जोरदार धुमश्चक्री झाली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जमावाने पोलिसांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत अधिक आक्रमक होत तीव्र लाठीमार केला.
बोपखेल-दापोडी रस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याची तसेच त्याकरील लष्कराचे निर्बंध हटविण्याबाबत ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने मागील आठवड्यात याचिका फेटाळून लावली. त्यानंतर १३ मेपासूनच लष्कराने पुन्हा हा रस्ता बंद केला. त्यामुळे बोपखेलवासीयांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. अखेर बोपखेलवासीय गुरुवारी रस्त्यावर उतरले. माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य श्रीरंग धोंदाडे, शिक्षण मंडळ सदस्य चेतन घुले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी ७ काजता गणेशनगर येथून मोर्चा काढला. रामनगर वरून सीएमईच्या प्रवेशद्वारावर साडेआठ वाजता मोर्चा धडकला. हजारो ग्रामस्थ त्यात सहभागी झाले होते. मोर्चात महिला अग्रस्थानी होत्या. सीएमईच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून महिलांनी प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यात एका विद्यार्थ्यासह आठजण जखमी झाले. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापात भर पडली. ग्रामस्थांनीही पोलिसांच्या व्हॅनवर दगडफेक करत काचा फोडल्या.