महाराष्ट्रातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, 12वीचा पेपर 25 एप्रिलला होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE )च्या फुटलेल्या 12वीच्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. तर दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील 10वीच्या मुलांना दिलासा देण्यात आला आहे. 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. तर दहावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा होणार आहे.

जुलै महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचंही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या सचिवांनी सांगितलं आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये दहावीचा पेपर फुटला होता. त्यामुळे आम्ही फक्त दिल्ली आणि हरिणायामध्ये दहावीच्या गणिताच्या पेपरची फेरपरीक्षा घेणार आहोत. येत्या 15 दिवसांत आम्ही 10वीच्या परीक्षेची तारीख जाहीर करू. पेपरफुटीमुळे त्रास झालेल्या मुलांना तात्काळ दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु हे पेपर कोणी फोडले आहेत हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही, अशी माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या फुटलेल्या पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. स्वत:ची चूक सुधारायची सोडून विद्यार्थ्यांना कसल्या परीक्षा द्यायला लावता, असा सवाल करतानाच पालकांनी विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नये, असे आवाहन त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *