हिंजवाडीमध्ये सव्वा कोटी रुपयांच्या सोने-चांदी लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेवाडी स्टेडियमच्या गेटसमोरील ही घटना आहे. बुधवारी (28 मार्च) मध्यरात्रीची ही घटना आहे. चोरीला गेलेले सोने-चांदी हे मुंबईहून आणण्यात आले होते. तब्बल 4 किलो 900 ग्रॅम वजनाचे हे सोने-चांदी असल्याची ही माहिती आली आहे.
पुण्यातील समृद्धी ज्वेलर्सचा कर्मचारी खासगी वाहनानं मुंबईहून सोने चांदी घेऊन पुण्यातील टिंबर्स मार्केटच्या दिशेनं प्रवास करत होता. यादरम्यान, बालेवाडी येथे काही वेळ वाहनातून फिरवून मोबाइल व दागिन्यांची बॅग चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार संबंधित कर्मचा-यानं पोलिसात दिली. हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र घटना घडून तब्बल 3-4 तासांनी फिर्याद देण्यात आल्यामुळे यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशीदेखील सुरू केली आहे.
