नाताळ व नववर्षानिमित्त बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले राहणार

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष मनमुरादपणे साजरा करता यावा याकरिता राज्य सरकारने बार आणि वाईन शॉप्सच्या वेळमर्यादेचे नियम शिथील केले आहेत. त्यानुसार येत्या २४, २५ आणि ३१ डिसेंबरला बार पहाटे पाच वाजेपार्यंत खुले राहतील. तर वाईन शॉपही रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नववर्षाच्या स्वागताला, ३१ डिसेंबर रोजी बार आण‌ि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत किती वेळ सुरू ठेवता येतील, याविषयीची परवानगी राज्य सरकारकडून दरवर्षी जाहीर करण्यात येते. त्यानुसार गृह खात्याने अबकारी कर विभागाशी चर्चा करून गुरूवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. त्यामुळे इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. एरवी वाईन शॉप्स साडेदहा वाजता बंद करण्याच नियम आहे. मात्र, या तीन दिवशी वाईन शॉप्सना एक वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, वेळेच्या या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क आण‌ि पोलिसांनी लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बनावट मद्याच्या पुरवठ्यावरही उत्पादन शुल्क व‌िभागाची नजर राहील.

वेळेत वाढ करण्यात आली असली, तरी बार आणि पब चालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस महासंचालकांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे. यापूर्वीही घातपाती कारवायांची धमक्या आणि महिलांच्या सुरक्षेचा हवाला देत मुंबई पोलिसांनी हॉटेल्स, बार खुले ठेवण्यावर दीड वाजेपर्यंतची मर्यादा घातली होती. मात्र, मुंबईकरांना सामाजिक ‘नाईटलाईफ’ अनुभवण्याची एकमेव संधी उरलेली असताना त्यालाही वेळेची मर्यादा घालून मुंबईकरांचा तो आनंद हिरावून घेतला जात असल्याचे ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश बासनात गुंडाळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *