मालवणी विषारी दारुप्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत केली. मग लेप्टोने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकार मदत का करत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे.
“लेप्टोमुळे मृत्यू ओढावलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसंच त्यांच्या कुटुंबियांना महापालिकेत नोकरी द्यावी”, अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच मालाडच्या मालवणीमध्ये विषारी दारुमुळे 102 जणांचा बळी गेला होता. तर अनेकजण रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे इथल्या अवैध दारुविक्रीबाबत प्रश्न उपस्थित झाला होता.
या मृत्यूतांडवानंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मुख्यमंत्री निधीतून ही रक्कम देण्यात आली.
अवैध दारू पिऊन मृत्यू झाला तरी सरकारने मदत दिल्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दारू पिऊन मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदत देता, मग लेप्टोसारख्या आजारामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदत का नाही, असा सवाल अहिर यांनी केला आहे.

