सावित्रीबाई, महात्मा फुलेंना भारतरत्न द्या

सावित्रीबाई, महात्मा फुलेंना भारतरत्न द्या

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देऊन गौरवान्वित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान समाजसुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. त्यांचे जीवन हे लोकसंघर्षाची प्रेरणाच होते. सर्वांना शिक्षणाची संधी, जातीप्रथेचे निर्मूलन, कृषी विकास, महिला व विधवांचे सबलीकरण यासाठीच्या लढ्याचे महात्मा फुले हे प्रतीक बनले होते, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. देशामध्ये स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यासाठीचे मोठे श्रेय जाते. महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महिलांमध्ये जागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचे निर्मूलन यासाठी महान कार्य केले. विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरत कार्य केले. पुणे आणि परिसरात प्लेगची साथ आलेली असताना त्यांनी केलेल्या सेवाकार्याला तोड नाही.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे असामान्य कार्य विचारात घेऊन भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळण्यास ते योग्य आहेत. त्यांना ही उपाधी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *