बीडच्या सीताफळाला GI मानांकन

बीडच्या सीताफळाला GI मानांकन

बीड जिल्ह्यातला किल्लेधारुर परिसर सीताफळाचं आगार म्हणून ओळखला जातो. इथल्या बालेघाटात उगवणारी सीताफळंही अतिशय गोड आणि मधूर. म्हणूनच इथल्या बालानगर जातीच्या सीताफळाला केंद्रातर्फे भौगोलिक निर्देशन म्हणजेच जीआय मानांकन मिळालं आहे. यामुळे या सीताफळांचं भविष्य आता बदलण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत येणारं फळपीक

बालेघाटाच्या डोंगररांगा या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. यामुळे इथल्या मातीत खनिजांची भरमार आहे. याचाच परिणाम इथल्या सीताफळावरही झाला आहे. या सीताफळांना वेगळी चव आणि गोडवा आहे आणि याच गोष्टीमुळं इथल्या बालानगरी जातीच्या सीताफळांना जीआय मानांकन मिळालं आहे.

अत्यंत कमी उत्पादन खर्चात सिताफळाची लागवड

सीताफळ अतिशय कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीतही चांगलं येणारं फळपीक आहे. यावर कोणती कीड वा रोग येत नाही. तसंच याला खतही द्यावं लागत नाही. यामुळं उत्पादन खर्च अतिशय कमी असतं. मात्र, असं जरी असलं तरी याला बाजारात चांगला भाव मिळत नाही. डोंगराळ भागातून  पायपीट करत शेतकरी ही सीताफळ बाजारात घेऊन येतो आणि याला व्यापारी दर देतात किलोमागं अवघे 3 ते 4 रुपये. तसंच ही फळ तीन चार दिवसांत विकली गेली नाही तर खराब होतात. यामुळं शेतकरी या फळाची लागवड करण्यास उत्सुक नसतो. मात्र, जीआय मानांकनामुळं इथल्या सीताफळाला बाजारपेठेत चांगला दर मिळेल आणि शेतकरी पुन्हा या फळाच्या लागवडीकडं वळेल, अशी तज्ज्ञांना आशा आहे.

जीआय नामांकन मिळाल्यानंतर परदेशातील निर्यात वाढणार

कोणत्याही शेतमालास जेव्हा जीआय मानांकन मिळतं, तेव्हा त्याचा कसा फायदा होतो ते पहा… जीआय ‘क्वॉलिटी टॅग’ मिळालेला दार्जेलिंगचा चहा साधारण चहाच्या तुलनेत दुपटीनं महाग विकला जातो. जीआय मिळाल्यानंतर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला भलतीच मागणी आली आणि तिच्या लागवड क्षेत्रात झपाट्यानं वाढ झाली. कोल्हापूरच्या गुळाला जीआय मानांकन मिळाल्यानंतर त्याचा दर झपाट्यानं वाढला. नाशिकच्या द्राक्षाला जीआय मानांकन मिळालं आणि त्याच्यासाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली. अन द्राक्ष उत्पादक शेतकरी संपन्न झाला. जीआय मानांकन मिळाल्यावर आपला शेतमाल जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व देशात विक्रीसाठी खुला होतो आणि यामुळं शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहतात.

सीताफळाला परदेशात मोठी मागणी

सीताफळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. आईस्क्रीमपासून ते जामपर्यंत अनेक गोष्टीत सीताफळाचा वापर होतो. मात्र, हे फळ लवकर खराब होत असल्यानं याला दर मिळत नाही. म्हणूनच बीडसाऱख्या जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं राहणं गरजेचं आहे. तरच इथल्या शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल.

सीताफळ हे बालाघाटच्या डोंगररांगाना मिळालेलं एक वरदान आहे. कोणत्याही कीड नाशक आणि रासायनिक खतांचा वापर न केल्यानं हे फळ विषमुक्त आणि अतिशय मधूर आहे. यामुळं आता शासनानं याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं करणं गरजेचं आहे. ज्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या सीताफळाला किंमत तर मिळेलच. शिवाय यातून या दुष्काळी भागातील लोकांना रोजगारही मिळेल.

जीआय नामांकन म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय?

 

विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र “जीआय’, अर्थात भौगोलिक निर्देशन, मानांकनातून मिळते.

भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्‍वासार्हता निर्माण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *