अनेक लोकांसाठी चहा म्हणजे अन्नाप्रमाणे मुलभूत गरज असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतामध्ये कधी टपरीवर, कधी हॉटेलमध्ये तर कोणी घरी आले की पहिल्यांदा त्याला चहा घेणार का विचारले जाते. चहाला अमृत मानणारे अनेक जण आपल्याकडे आहेत.
चहा घेतल्याने तरतरी येते किंवा टॉनिक घेतल्यासारखे वाटते असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र, रिकाम्यापोटी घेतलेला चहा आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असतो. काश्मिरमधील कावा असो किंवा ग्रीन टी आणि लेमन टी आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. आलं, तुळस, लवंग, वेलची आणि दालचिनी यांसारखे पदार्थ घालून केलेला आरोग्यदायी चहाही उत्तम. मात्र, चहा पावडर आणि दूध घालून केलेला चहा तोही रिकाम्यापोटी घेतल्यास तो आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. चहामुळे कोणते दुष्परिणाम होतात पाहूया…
* रिकाम्या पोटी चहा पिण्याने पचनतंत्र बिघडते. पोट रिकामे असताना चहा घेतल्यास शरीरातील आम्ल अचानक उसळते आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. अॅसिडिटीमुळे इतर अनेक समस्या उद्भवतात.
* रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील अग्नी मंदावतो. त्यामुळे पुढचा बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपण पोषणापासून वंचित राहतो. शरीराचे योग्य पोषण न झाल्याने प्रतिकारशक्ती कमी होते.
* चहा अती उकळलेला असल्यास तो आतड्यांसाठी आणि पोटातील इतर अवयवांसाठी चांगला नसतो. चहामधील कॅफेन रिकाम्या पोटासाठी घातक असते. त्यामुळे शक्यतो रिकाम्या पोटी चहा घेणे टाळावे.
* रिकाम्या पोटी चहा घेण्याची वेळ आलीच तर त्यासोबत बिस्कीट, टोस्ट, ब्रेड खावे. त्यामुळे त्रास कमी होतो. अन्यथा पोटात किंवा श्वसन नलिकेत जळजळ होणे, उलटी येणे, जीव घाबरणे अशा समस्या उद्भवतात.