फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिटय़ूट ऑफ इंडिया (FTII)च्या अध्यक्षपदी अभिनेते आणि भाजप नेते गजेंद्र चौहान यांची नियुक्तीवरून सुरू असलेला वाद संपता संपत नाहीये. फिल्ममेकर जानू बरुआ आणि सिनेमेटोग्राफर संतोष सिवान यांच्यानंतर अभिनेत्री पल्लवी जोशीनेही एफटीआयआयच्या संचालक मंडळावरुन राजीनामा दिला आहे.
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरुन सुरु असलेल्या वादानंतर पल्लवी जोशी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला एक पत्र लिहून आपण संचालक मंडळात काम करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
पल्लवी जोशी म्हणाली, एफटीआयआयच्या प्रमुखपदाच्या निवडीबाबत मला काहीच अडचण नाही. पण, सध्या निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणात मी काम करु शकत नाही. जर विद्यार्थीच खूश नसतील, तर FTII मध्ये रहाण्याचा काय उपयोग. जर हीच परिस्थिती असेल तर चित्रकर्मी आणि छायाचित्रकार यांच्याशी आपण तडजोड करतोय असा त्याचा अर्थ होईल, असं पल्लवी यांचं म्हणणं आहे. तसचं FTII सदस्यत्वामध्ये आता आपल्याला रस राहिला नसल्याचंही पल्लवी जोशीने पत्रात नमूद केलं आहे.

