सेल्फी फ्लॅश, पाण्याची मोटर!

दहावीत नापास होणे म्हणजे करिअरच्या वाटा बंद होणे’, हा समज दिवा येथील कल्पेश कदम आणि दहिसर येथील रूपेश भोईर या विद्यार्थ्यांनी फोल ठरविला आहे. दहावीत नापास झाल्यानंतरही या दोघांनी कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या जोरावर झेप घेतली आहे. कल्पेशने मोबाइल फोनसाठी ‘सेल्फी फ्लॅश’, ‘पॉवर बँक’ तयार करून तर, साध्या बाइकच्या बॅटरीपासून पाण्याची मोटर तयार करून रूपेशने दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्या’चा आदर्श ठेवला आहे.

राज्य सरकारतर्फे गेल्यावर्षीपासून दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. फेरपरीक्षेतही नापास झाल्यास विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरविण्यात येते. त्यानुसार कल्पेशला भांडुप येथील नवजीवन एज्युकेशन सोसायटीत प्रवेश देण्यात आला. तेथे तो कौशल्य विकास अभ्यासक्रमाद्वारे मोबाइल रिपेअरिंगचे धडे घेत आहे. मन लावून अभ्यास करत कल्पेशने ‘टाकाऊपासून टिकाऊ’ असा मोबाइल पोर्टेबल चार्जर तयार केला. शिवाय, मोबाइलसाठी ‘सेल्फी फ्लॅश’ही बनवला. वर्षभराच्या मेहनतीनंतर कल्पेशने ही उपकरणे बनविली आहेत. कल्पेशची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील अपंग आहेत. आई घरकाम करून संसाराचा गाडा हाकते. आईला मदत करण्यासाठी कल्पेश मॉलमध्येही काम करतो.

रूपेशच्याही जिद्दीला सलाम

दहिसर पूर्व येथील रूपेश भोईर याची कहाणीही कल्पेशसारखीच आहे. दहावीच्या परीक्षेत तीन विषयांत नापास झालेल्या रूपेशने शिक्षणाची दारे बंद झाल्याच्या भावनेतून मित्राच्या गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याने साध्या बाइकच्या बॅटरीच्या मदतीने पाण्याची मोटर बनविली आहे. रूपेशही सध्या कौशल्यपूर्ण विकास अभ्यासक्रमाद्वारे मोबाइल रिपेअरिंगचे धडे घेत आहे.

३ हजार ९०० विद्यार्थी

रूपेश आणि कल्पेशप्रमाणे राज्यात ३ हजार ९०० विद्यार्थी कौशल्यपूर्ण विकास योजनेनुसार विविध अभ्यासक्रमांचे धडे घेत आहेत. राज्यातील १११ केंद्रांवर त्यांना हे प्रशिक्षण दिले जात असून, त्यांच्यात मुलींचाही समावेश असल्याची माहिती विवेक सुर्वे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *