महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनं संतप्त झालेल्या अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत धीरज परदेशी यांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ‘धीरजची हत्या झाली, ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेतील आरोपींना आम्ही सोडणार नाही’, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ‘मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारकडून कोणतीही कसर ठेवली जाणार नाही’, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘हत्यारांना फाशी झाली पाहिजे, यासाठी जी कायदेशीर कारवाई करता येईल, ती आम्ही करू’, अशी ठाम ग्वाही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्धार
‘अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही’, असा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत विविध संघटना आणि नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना सरकारने गांभीर्यानं घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
