महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानांना उशीर झाल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने नागरी हवाई उड्डाण खात्यातून यासंदर्भातील अहवाल मागवला आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्याने ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान उड्डाण खात्याला विमानांना उशीर झाल्याबद्दल अहवाल मागवला आहे. दरम्यान, नागरी विमान खात्याचे सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले की, आम्ही एअर इंडियाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू हे २४ जून रोजी लेह ते दिल्ली एअर इंडियाच्या विमानात बसले. त्यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह आणि त्यांचे सहकारी होते. या तिघांची सोय करण्यासाठी तीन प्रवाशांना विमानाबाहेर काढण्यात आले. या सर्व प्रकारामुळे विमानाला विलंब झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.
मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला विलंब झाल्याचे कारण देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
तसेच २९ जून रोजी एअर इंडियाच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी अमेरिकेला निघाले होते. मात्र, परदेशी यांनी अमेरिकेचा वैध व्हिसा असलेला पासपोर्ट सोबत घेतला नाही. त्यामुळे दीड तास विमान थांबवावे लागले.

