खासगीं’मुळे घसरला मुंबईचा निकाल

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात यंदा मुंबई विभागीय मंडळ तळाला फेकला गेला आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि खासगीरीत्या परीक्षा देण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबईच्या एकूण निकालाला फटका बसला असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालानुसार यंदा पुन्हा कोकण विभागाने बाजी मारली असली तरी नेहमी सातव्या किंवा आठव्या स्थानावर राहणारे मुंबई विभागीय मंडळ अगदी तळाला गेल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. यंदा मुंबई विभागातून एकूण तीन लाख १७ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८८.२१ टक्के विद्यार्थी म्हणजेच दोन लाख ७९ हजार ९०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे.

मुंबईच्या विभागवार निकालावर नजर टाकली असता यंदा पुन्हा पालघर विभागाने बाजी मारल्याचे दिसून आले आहे. पालघरचा एकूण निकाल ८८.०९ टक्के लागला असून, या विभागातून यंदा ३३ हजार ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पालघरपाठोपाठ मुंबई पश्चिम उपनगराचा निकाल ८७.५४ टक्के लागला आहे. त्यानंतर रायगड विभागाचा निकाल ८६.२६ टक्के, ठाणे ८५.९२, मुंबई पूर्व उपनगर ८४.०१ आणि मुंबई शहर ८१.२७ टक्के लागल्याचे बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात दिसून आले आहे.

मुंबई विभाग यंदा सध्या सर्वांत तळाला असली तरी निकालाबाबत मुंबई विभागाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबई विभागाचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला असून ही नक्कीच आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *