परदेशातून प्राणी, पक्षी आणण्यास बंदी

मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन दगावल्याच्या घटनेनंतर सेंट्रल झू ऑथॅरिटीने परदेशातून प्राणी, पक्षी आणण्यावर बंधने घातली आहेत. ‘परदेशातून प्राणी, पक्षी आणू नका. अपवादात्मक परिस्थितीत परदेशातून प्राणी, पक्षी आणण्यासाठी झू ऑथॅरिटीची परवानगी घ्या,’ असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरातील प्राणिसंग्रहालयांना आपल्याच देशात परदेशी प्राणी, पक्ष्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.
प्राणिसंग्रहालयांमध्ये परदेशी प्राणी, पक्षी असावेत असा आग्रह अलीकडच्या काळात धरला जात आहे. मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन पक्षी दगावल्याच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयातील परदेशी प्राणी, पक्ष्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. या घटनेची नोंद घेत सेंट्रल झू ऑथॅरिटीने देशभरातील प्राणिसंग्रहालयांना परिपत्रक काढून सतर्क केले आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘भारतीय वंशांच्या प्राण्यांवर सेंट्रल झू ऑथॅरिटीची आतापर्यंत बंधने होती. ऑथॅरिटीच्या परवानगीशिवाय भारतीय वंशाचे प्राणी किंवा पक्षी प्राणिसंग्रहालयांमध्ये ठेवता येत नव्हते. मुंबईत पेंग्विनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर झू ऑथॅरिटीने नवीन निर्णय घेतला असून, त्याचे परिपत्रक प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांना पाठवले आहे. या परिपत्रकानुसार; परदेशातून प्राणी, पक्षी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. देशांतर्गत प्राणिसंग्रहालयात हे प्राणी, पक्षी उपलब्ध असतील, तर झू ऑथॅरिटीच्या परवानगीने ते आणता येतील. अपवादात्मक परिस्थितीत परदेशातून प्राणी, पक्षी आणण्याचा निर्णय एखाद्या शहराच्या प्राणिसंग्रहालयाने घेतलाच, तर त्यासाठी झू ऑथॅरिटीची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. यापूर्वी झू ऑथॅरिटीच्या परवानगीची सक्ती नव्हती. परदेशातून प्राणी, पक्षी आणण्याचे काम करणाऱ्या खासगी संस्थांशी संपर्क साधून केले जात होते. आता त्यावर झू ऑथॅरिटीने निर्बंध घातले आहेत.’

जिराफासाठी म्हैसूरशी संपर्क
औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयात जिराफ आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जिराफाची जोडी आणण्यासाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून टांझानिया येथील प्राणिसंग्रहालयाशी संपर्क साधण्यात आला होता. त्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च केले जाणार होता. सेंट्रल झू ऑथॅरिटीने परदेशातून प्राणी, पक्ष्यांसंदर्भात काढलेल्या परिपत्रकामुळे औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने परदेशातून जिराफ आणण्याचा प्रयत्न सोडून दिला आहे. म्हैसूर येथील प्राणिसंग्रहालयात नुकताच एका जिराफाचा जन्म झाला आहे. जन्मलेले जिराफाचे पिल्लू औरंगाबादसाठी द्यावे, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *