डाळी आणि इतर जीवनावश्यक अन्नधान्याच्या किमतींवरील वाढत्या दबावाने चिंतित केंद्र सरकारने सात जुलै रोजी सर्व राज्यांच्या अन्नधान्य पुरवठा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या वर्षी कमी पाऊस झाल्यास अन्नधान्य महागाईशी दोन हात करण्यासाठी एकत्रित धोरण या बैठकीत ठरवले जाणार आहे.
दिवसभर चालणारी ही बैठक अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता असून अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान आणि कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक होईल.
डाळींचे गगनाला भिडलेले भाव नियंत्रित करण्यासाठी सात जुलैला ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे पासवान म्हणाले. यामध्ये साठेबाजी रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि एपीएमसी कायद्यांतर्गत हाती घेण्यात आलेल्या सुधारणांचाही यात आढावा घेण्यात येईल.
तसेच जुलै-ऑगस्टमधील कमी पावसाच्या शक्यता आणि अशा स्थिती अन्नधान्य महागाई वाढल्यास ती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

