वर्षाला साडेतीन हजार रेल्वे प्रवाशांचा बळी घेणार्या मुंबई उपनगरी रेल्वेच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय संसदीय समितीचे शिष्टमंडळ मुंबईच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आले आहे. मुंबईतील गर्दी पाहून त्रिवेदी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘एकीकडे आपण चांद्रयान पाठवित आहोत, तर दुसरीकडे आपली जनता सार्वजनिक वाहनांतून गुराढोरांसारखी प्रवास करत आहे. एकेकाळी चीन आपल्या १५ वर्षे मागे होता, तो आता १०० वर्षे पुढे गेला आहे. भारतीय रेल्वेचा पायाच ढासळला आहे. भारतीय रेल्वे एअर इंडियाच्या वाटेने जात आहे. तिला दिवाळखोर होण्यापासून वाचवायला हवे. रेल्वेच्या कर्मचार्यांकडे जबरदस्त क्षमता असून तिला ओळखण्याची गरज असल्याचे त्रिवेदी म्हणाले.
मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे मधू कोटियन यांनी संसदेला अर्ज केला होता. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी याप्रकरणी १५ सदस्यीय समिती नेमली असून या समितीने सोमवारी सकाळी ११ वाजता भांडुप स्थानकाला भेट दिली. समितीचे अध्यक्ष भगत सिंग कोशयारी, शिवसेना खासदार राजन विचारे, रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनील कुमार सूद, विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकूळ आणि खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते.