गर्भधारणा झाल्यानंतर बाळाला कवटीच नसल्याचा विचित्र प्रकार २४ व्या आठवडय़ात समोर आल्याने एका दाम्पत्याने गर्भपाताची परवानगी मागितली. मात्र नियमानुसार २० आठवडय़ांनंतर गर्भपात करता येत नसल्याने या दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालात धाव घेतली. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या अहवालानंतर न्यायालयाने त्यांना गर्भपाताची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे.
डोंबिवली येथे राहणा-या या तरुणाचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याच्या २२ वर्षीय पत्नीला गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीत बाळाच्या डोक्याला कवटीच तयार झालेली नसल्याचे त्यांना डॉक्टरांना आढळले. त्यामुळे ही महिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल झाली. हे बाळ जन्माला आले, तरी ते जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर या दाम्पत्याने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.
मात्र सरकारी नियमानुसार २० आठवडय़ांपेक्षा जास्त कालावधीनंतर गर्भपात करण्यास परवानगी नसल्याने त्यांनी परवानगीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने केईएम रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल तपासून या दाम्पत्याला गर्भपात करण्याची परवानगी दिली.
केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हा गर्भपात करावा, तसेच यासंबंधी सर्व रेकॉर्ड ठेवावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.