मानखुर्दच्या झोपडपट्टीतील अग्नितांडव नियंत्रणात; दोन जण जखमी

मुंबईच्या मानखुर्द परिसरातील मंडाला झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तब्बल १२ तास ही आग धुमसत होती. गुरुवारी संध्याकाळी लागलेली ही आग शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली. या आगीत २ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. केमिकलच्या साठ्यामुळे ही आग धुमसत राहिल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

मानखुर्दच्या मुंबई-वाशी रस्त्यावरील ट्रॉम्बे नाक्याजवळ ही आग लागली होती. तब्बल १२ तास धुमसत राहिलेल्या या आगीत दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या राजावाडी आणि शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, आगीची तीव्रता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलिवण्यात आले होते. तसेच आग इतक्यात विझण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे येथील तीन स्थानिक शाळांमध्ये लोकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मानखुर्द स्थानकाला लागून असलेला हा परिसर दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलाला सुरूवातीपासूनच आग विझविण्यात अडथळे येत होते. येथील गल्ल्यांचा परिसर चिंचोळा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आतमध्ये शिरणे अशक्य झाले होते. अग्निशमन दलाच्या १७ गाड्या आणि पाण्याचे १० बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी तैनात होते. आगीचे रौद्ररूप पाहता इतर अग्निशमन केंद्रांवरील गाड्यांनाही याठिकाणी पाचारण करण्यात आले. तसेच पाच रूग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली होती. या घटनेनंतर या परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, या सगळ्या गोंधळामुळे परिसरातील सायन- पनवेल मार्गावरच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीची एकूणच तीव्रता बघता मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही लागली होती. या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. मंडाला विभागातील कुर्ला स्क्रॅप असोसिएशनमध्ये तेलाचे गोदाम असून या गोदामाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग बाजूला असलेल्या रद्दीच्या गोदामाला लागली. ज्या परिसरात आग लागली आहे. त्या परिसराच्या बाजूला झोपडपट्टी असल्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आगीची तीव्रता पाहता या परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर तब्बल १२ तासांनंतर या आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *