अमूल, गोकुळ, वारणा आणि मदर डेअरी या चार कंपन्या कमिशन वाढवत नसल्याने ठाण्यासह अनेक ठिकाणच्या स्थानिक दूध विक्रेत्यांच्या संघटनांनी आज, बुधवारपासून या कंपन्यांची दूधविक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संघटनांची शिखर संघटना असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघा’ने बंदबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने मुंबईसह बदलापूर-अंबरनाथ आणि पनवेल-पेणपर्यंत ‘दूधकोंडी’बाबत संभ्रमावस्था आहे.
दूधविक्रेते ग्राहकांकडून ‘कूलिंग चार्जेस’च्या नावाखाली बेकायदेशीरपणे ‘एमआरपी’पेक्षा एक-दोन रुपये अधिक आकारत होते. त्याविरोधात वैध मापन शास्त्र विभागाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली असता, विक्रेत्यांनी पाच प्रमुख ब्रँडच्या कंपन्यांना लक्ष्य केले. या कंपन्यांच्या दुधाचीच सर्वाधिक विक्री असताना त्या कंपन्या सर्वात कमी कमिशन देत असल्याचे सांगत, १ मेपासून या कंपन्यांच्या दूधविक्रीवर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेने दिला होता. ठाणे परिसरात या कंपन्यांची दूधविक्री बंदही झाली होती. मात्र, कंपन्यांच्या आग्रहास्तव त्यांना संघटनेनेकडून १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली. तरीही चार कंपन्यांनी निर्णय घेतला नसल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथपर्यंतच्या भागात या कंपन्यांची दूधविक्री होणार नसल्याचे ठाणे शहर दूध विक्रेते कल्याणकारी संघ तसेच कल्याणमधील संघटनेने जाहीर केले आहे.
मुंबईतील विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारे तसेच शिखर संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश नायकल व सचिव अमित भुवड यांनी मात्र दूधविक्री बंदीबाबत अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याचे मंगळवारी ‘मटा’ला सांगितले. त्यामुळे मुंबईसह बदलापूर-अंबरनाथ आणि पनवेल-पेणपर्यंत ग्राहकांना या चार ब्रँडचे दूध मिळणार की नाही याविषयी संभ्रमावस्था आहे. संघटनेचे अध्यक्ष असलेले ठाण्यातील अमर दळवी यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यानिमित्ताने शिखर संघटनेत एकजूट नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कमी दराने दूधखरेदी करणाऱ्यांवर फौजदारी
राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून दूधखरेदीसाठी करण्यासाठी २० रुपये प्रतिलिटर दर ठरवून दिला आहे. त्यापेक्षा कमी दराने दूध संस्था दूधखरेदी करत असेल, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा इशारा दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिला.
आतापर्यंत काय?
विक्रेत्यांना कमिशनवाढ मिळण्यासाठी ‘महानंद’ने काही दिवसांपूर्वी दुधाचे दर दोन रुपयांनी वाढवले.
गोकुळनेही एक रुपया वाढवण्याची तयारी दर्शवली. मात्र, संघटनेने ती नाकारल्याने अधिक वाढीबाबत निर्णयासाठी ‘गोकुळ’ने ३१ मेपर्यंतची मुदत मागितली आहे.
‘महानंद’ व ‘गोकुळ’चा निर्णय झाल्यानंतर आम्ही विचार करू, असे ‘वारणा’ने सांगितले आहे.
‘मदर डेअरी’ही सकारात्मक प्रतिसाद देत आहे. मात्र, ‘अमूल’चा प्रतिसाद नाही.