सकाळच्या वेळी चाकरमानी मुंबईच्या दिशेने येण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहचले असतानाच मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. खडवलीत घेण्यात आलेल्या पॉवरब्लॉकमुळे ही सेवा विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्रीचा पॉवरब्लॉक लांबल्याने लोकल रखडल्या आहेत. दरम्यान लोकल थांबवून एक्स्प्रेसला जाण्यासाठी जागा दिल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्टेशनवर आंदोलनास सुरुवात केली आहे. कल्याण ते कसारा दरम्यान वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. तर कर्जत-कल्याण-सीएसटी सेवा व्यवस्थित सुरु असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. केडीएमसीने प्रवाशांसाठी बससुविधा सुरु केली असून गरजेप्रमाणे बसेस सोडण्यात येत आहेत.
कसारा ते कल्याण अप आणि डाऊन वाहतूक पूर्णपणे बंद असून अनेक एक्स्प्रेस ट्रेन्सही रखडल्या आहेत. सकाळची वेळ असल्याने चाकरमानी कामानिमित्त मुंबईच्या दिशेने येत असतात. मात्र सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. रेल्वे स्थानकांवर कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आहे. मध्य रेल्वे लवकर सुरळीत न झाल्यास प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो.