मुसळधार पावसाने मुंबई पालिकेच्या भोंगळ कारभाराचा पंचनामाच आज केला आहे. गेल्या सुमारे १० तासांपासून मुंबई ठप्प असताना पालिका प्रशासन मात्र मुंबईकरांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढून देण्यात पूर्णपणे हतबल दिसत आहे.
रात्रीपासून वाढलेला पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढच्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने मुंबईकरांनी आज घराबाहेर पडू नये, प्रवास शक्यतो टाळावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दुपारी २.२९ वाजता समुद्रात ४.४७ मीटरच्या लाटा उसळणार असल्याने धोका आणखीच वाढला आहे.
पुढचे २४ तास धोक्याचे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांत मुंबई आणि परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आज दुपारी अडीच वाजता समुद्रात ४.४७ मीटरच्या लाटा उसळणार असल्यानेही भीती निर्माण झाली आहे. भरतीपर्यंत मुंबईतील पाऊस कमी न झाल्यास मीठी नदीच्या परिसरात धोका निर्माण होऊ शकतो, असा सावधगीरीचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई पालिका आयुक्त मेहता तसेच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या रस्त्यांवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

