निवडणुकीत मतदानाच्यावेळी बोटावर खूण करण्यासाठी वापरतात तशी शाई बँकांमध्ये वापरण्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. मतदान केल्याची खूण म्हणून बोटांवर लावली जाणारी शाई बँकांमध्ये वापरु नका असे निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
पुढच्या काही महिन्यात अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही चिंता व्यक्त केली. एकदा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरीकाने पुन्हा दुस-यांदा मतदान करु नये यासाठी बोटांवर शाई लावली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागत आहेत. पैसे बदलून घेण्यासाठी काहीजण वारंवार रांगेत येऊन उभे रहातात. एका बँकेतून नोटा बदलल्यानंतर पुन्हा दुस-या बँकेच्या रांगेत जाऊन उभे रहातात. त्यामुळे रांगा वाढत असल्याने यावर उपाय म्हणून सरकारने नोटा बदलण्यासाठी येणा-या नागरीकांच्या बोटांवर शाई लावण्याचा निर्णय घेतला.
