आयुर्वेदिक औषधांची गुणवत्ता तपासणे आव्हान

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी म्हटले की, पारंपरिक जडी-बुटीपासून बनविण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक औषधांतील मिश्रण अत्यंत किचकट असते. या मिश्रणातील घटकांना स्थापित मानकांनुसार शोधणे कठीण काम आहे.

आयुष मंत्रालय सध्या एका आयुर्वेदिक औषधामुळे निर्माण झालेल्या वादात झगडत आहे. या आयुर्वेदिक औषधाने मधुमेहावर उपचार केले जाऊ शकतात, असा दावा संबंधित कंपनी करीत होती. या औषधाच्या जाहिरातीवर आॅक्टोबरमध्ये बंदी घालण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आयुषमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. दिल्लीत हर्बल उत्पादनांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नियमन सहकार्य या विषयावरील नवव्या वार्षिक बैठकीत नाईक यांनी म्हटले की, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी औषधांच्या गुणवत्तेची संपूर्ण खात्री करून घेणे आवश्यक आहे. लोकांना पूर्ण विश्वासाने औषध सेवन करता आले पाहिजे. नाईक म्हणाले की, वास्तविक आयुर्वेदिक उत्पादनांची गुणवत्ता तपासणे हे एक मोठे आव्हान

आहे. योग्य प्रकारे नियमन करूनच यावर तोडगा काढला जाऊ शकतो.

नाईक यांचे हे वक्तव्य आयुष-८२ या औषधाच्या जाहिरातीच्या संदर्भात आले आहे. आयुष-८२ हे औषध केंद्रिय आयुर्वेदिक संशोधन परिषदेने विकसित केले आहे. या औषधाने मधुमेह बरा होतो, असा दावा जाहिरातीत करण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर, या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे, हे औषध विकसित करणारी संस्था केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *