दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर पुण्यात नोकरी करीत असल्याने खराडी बायपासपासून दुपारी 3 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान दररोज 50 जादा गाड्या सुटणार आहेत, अशी माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक ए. जी. जाधव यांनी दिली.
जादा गाड्यांत प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणही करताना येणार आहे. खराडीतून जादा बसेस सोडण्यात येणार असल्या, तरी शिवाजीनगर, स्वारगेट बसस्थानकांतून येणार्या नियमित गाड्याही सुरू राहणार आहेत. नगर जिल्ह्यातील इतर आगारांतून बीड, कल्याण, पुणे, कोल्हापूर, जालना, औरंगाबाद, नाशिक, रत्नागिरी, तुळजापूर, धुळे, अक्कलकोट, पंढरपूर, बुलढाणा, मालेगाव, कसारा आदी ठिकाणीही जादा बस सोडण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यातील बहुतांश नोकरदार पुणे येथील चंदननगर, खराडी, मुंढवा, कोंढवा, हडपसर, वाघोली, विमानगर, विश्रांतवाडी, दिघी, भोसरी, येरवडा, कल्याणीनगर, आळंदी परिसरात नोकरीस आहेत. दिवाळीसाठी त्यांना गावी येण्यासाठी शिवाजीनगर बसस्थानकावर जावे लागत होते. गर्दीमुळे त्यांना पुणे शहरातून बाहेर पडण्यासाठीच दोन ते तीन तास लागतात. हा वेळ वाचावा, यासाठी खराडी बायपासजवळ सुमारे अडीच एकर जागेत तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. तेथून 21 ते 30 ऑक्टोबरदरम्यान नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जादा बस सुटणार आहेत.
वाघेश्वर पार्किंग यार्ड अशा नावाने असणार्या या बसस्थानकावर या दहा दिवसांत सुमारे 368 जादा बस सुटणार असून, प्रवाशांसाठी सर्व सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे (खराडी बायपास) येथून दुपारी तीननंतर दर तासाला जामखेड, श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव, पाथर्डी, बीड, औरंगाबाद, शेगाव, माजलगाव आदी ठिकाणी बस उपलब्ध असतील.