एका बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र जिल्ह्यातील तणाव निवळत असून हळूहळू परीस्थिती पूर्वपदावर येत आहे. मध्यरात्रीनंतर आंदोलन थांबवण्यात आले. तर मुंबई-नाशिक वाहतूक खुली करण्यात आली. मात्र तरीही जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसत आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे एका अल्पवयीन मुलाने एका चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले होते. या आंदोलनाचे लोण नंतर नाशिक जिल्ह्यात पसरले होते. रविवारी दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते. आक्रमक झालेल्या जमावाने सुमारे २० गाड्यां पेटवून दिल्या. यात एसटी बसेस, पोलिसांच्या गाड्या आणि काही खाजगी वाहनांचाही समावेश होता. दिवसभर सुरू असलेल्या या जाळपोळीच्या सत्राने नाशिक जिल्ह्यातले ६ मार्ग जवळपास ठप्प झाले होते. त्यामुळे हजारो प्रवासी रस्त्यातच अडकून पडले होते.
