शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू, असे आश्वासन सरकारने दिले होते. हिवाळी तर सोडाच; पण पावसाळी अधिवेशनातही तरतूद करण्यात आली नाही. सरकारने शिक्षक हा कुचेष्टेचा विषय केला असल्याचा आरोप करीत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी, शाळा बेमुदत बंद ठेवा म्हणजे सरकार झुकेल, अशी जहरी टीका केली.
औरंगाबाद येथील शिक्षक मोर्चावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध, तसेच शिक्षण संस्थांना अनुदान यासंदर्भातील निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना सादर करण्यापूर्वी वर्टी कॉलनीत झालेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार अपूर्व हिरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे कोंडाजी आव्हाड उपस्थित होते. शिक्षक मोर्चावर झालेला लाठीचार्ज ही संतापजनक घटना असल्याचे नमूद करीत आमदार डॉ. तांबे म्हणाले की,विनाअनुदानित तत्त्वच आपल्याला मान्य नाही. 100 टक्के अनुदान द्यावे म्हणून आजपर्यंत दीडशे आंदोलने झाली आहेत.