घावनळे – खुटवळवाडी येथील अक्षय शंकर कानडे या इयत्ता आठवीत माणगाव हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या शाळकरी मुलाने माणगाव – नमसवाडी येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. गुरूवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मूळ घावनळे येथील कानडे कुटुंबीय व्यवसायानिमित्त माणगाव येथील राणे यांच्याकडे भाड्याने राहतात. आई-वडील कामामुळे बाहेर गेले होते. दरम्यानच्या वेळी बुधवारी संध्याकाळी अक्षय शाळेतून घरी आला व दरवाजे, खिडकी बंद करून खोलीत गेला. काही वेळानंतर आलेल्या वडिलांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षयने दरवाजा उघडला नाही. अखेर अक्षयच्या वडिलांनी कौले काढून खोलीत प्रवेश केला असता अक्षस गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. अक्षयने साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. संध्याकाळच्या वेळी दररोज घरी असणारी अक्षयची बहीणही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सरावासाठी बाहेर गेली होती. शाळेत पुस्तक फाटल्याने अक्षयचे मित्रासोबत भांडण झाल्याची चर्चा होती. मात्र, अक्षयच्या मृत्यूबाबत नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. याबाबतचा अधिक तपास माणगाव पोलिस करीत आहेत. माणगाव विद्यालयाने शाळा लवकर सोडून अक्षयला श्रद्धांजली वाहिली.