स्वत:च्या दु:खापेक्षा दुसर्याचे दु:ख वाटून घेण्यामध्ये अग्रेसर असलेल्या मराठा महिलांची मराठा क्रांती मोर्चामधील विक्रमी उपस्थिती रेकॉर्ड ब्रेक होती. सुमारे 15 लाखांवर महिलांनी मराठा क्रांती मोर्चासाठी उपस्थित राहून महिला अत्याचाराविरोधात वज्रमूठ आवळली.
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सातारा शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून महिला सकाळी 6 वाजल्यापासून आपली शिदोरी सोबत घेऊन अनेक मैलोनमैलाचा प्रवास करून सातारा शहरामध्ये दाखल झाल्या होत्या. ग्रामीण भागातील मराठा कारभारनी तर भल्या पहाटे उठून घरातील दैनंदिनी आवरून सातारा शहरामध्ये दाखल झाल्या होत्या. शहरात येण्यासाठी किमान तीन किमीचे अंतर पायी चालून या रणरागिणी आपल्या कलेक्शन सेंटरवर हजर होत्या.
जिल्हा परिषद मैदान, शाहू स्टेडियम, कोटेश्वर मैदान, गांधी मैदान या ठिकाणी महिला जमल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा परिषद मैदानावरील महिला मोर्चासाठी मार्गस्थ झाल्या. या महिला जि. प. मैदानावरुन आरटीओ कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, पारंगे चौक, शाहू स्टेडियममार्गे ‘राधिका’ रस्त्याने मोती चौकामध्ये येऊन मग वरच्यारस्त्याने शिवतीर्थावर पोहोचल्या. महिलांच्या या जथ्थ्याने सारा रस्ता व्यापला होता. महिलांनी तुडूंब भरलेला रस्ता पोवई नाक्याच्या दिशेने जात होता तेव्हा अवघ्या राजपथावरील जनता रस्त्यावर येऊन हे अप्रूप पहात होती. महिलांची गर्दी आता संपेल, मग संपेल अशी वाट पाहिली जात होती. अर्धा तास झाला, एक तास झाला, दीड तास झाला महिलांची रस्त्यावरील गर्दी काही हटतच नव्हती. भला मोठा राजपथ महिलांनी ओसंडून वाहत होता. शिवतीर्थावर तिकडे दुपारच्या दोनच्या दरम्यान राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हाही राजपथच नव्हे तर गांधी मैदान, कोटेश्वर मैदान, शाहू स्टेडियमपर्यंतच्या रस्त्यावर महिलाच महिला होत्या. महिलांची ही रांग अखंडपणे सुरू होती. मोर्चा संपल्याची घोषणा झाली तेव्हा गांधी मैदान, कोटेश्वर मैदानावरील मराठा रणरागिणी जागच्या हलल्याही नव्हत्या. महिलांची अखंड रांग सुरूच असल्याने त्यांना मोर्चात सामील होता आले नाही. अशा लाखो महिला भगिनी रस्त्यावर आल्याने त्यांचे मूक आक्रंदन शासनकर्त्यांना बोलते करणारेच ठरले.
महाविद्यालयीन युवती उत्स्फूर्तपणे मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. मोर्चामध्ये सहभागाशिवाय स्वयंसेवक म्हणूनही युवतींनी सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय पारंपरिक वेशभूषेत युवती व महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचा समारोप झाल्यानंतरही महिला व युवतींचा लोंढा शिवतीर्थावर येतच होता.