काश्मीरमधील संवेदनशील वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्य़ात किनारपट्टी भागात ‘ऑपरेशन सुरक्षा’ अभियान सुरू आहे. पोलीस, तटरक्षकदल व नौदल यांची संयुक्त मोहिमेद्वारे किनारी भागात निगराणी ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्य़ाला १६७ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. मागील आठवडाभर भारत-पाक सीमेवर तणावाचे वाढलेला आहे. परिणामी देशामध्ये दहशतवादी कृत्य घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील अनुभवामध्ये दहशतवादी कृत्यांसाठी कोकण किनारपट्टीचा उपयोग करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा पुन्हा वापर होऊ नये यासाठी कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी केला आहे. किनारी भागात संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्याची तात्काळ माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्याचे आवाहन केले आहे. सागरी सुरक्षा दलाच्या सदस्यांना लक्ष्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. किनारपट्टीवरील बंदरे व मासळी उतरवण्याच्या ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे. मासळी उतरवण्याच्या केंद्रावर भरती व ओहोटीच्या वेळेनुसार ९१ लॅण्िंडग स्पॉटवर सुरक्षा रक्षकांमार्फत लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अशोक यांनी सांदितले.
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड व ग्रामीणमधील त्या गुन्हेगारांवर ‘मोक्का’ दाखल करण्यापूर्वी योग्य ती तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयामध्येही ही केस दाखल करून घेण्यात आली. यामध्ये कोणताच आपपरभाव ठेवण्याचा प्रश्न नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी सांगितले आहे. तसेच त्या गुन्हेगारांवरील जामीन रद्द करण्यासंदर्भातील सुनावणी येत्या ५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरांमध्ये गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्य़ांचा पर्दापाश करण्यासाठी खेड, चिपळूणमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणप्रमाणे स्वतंत्र तपासिक यंत्रणा (डिटेक्शन ब्रँच) सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे आदेश त्या-त्या पोलीस स्थानकांना दिल्याचे अशोक यांनी सांगितले.