धुळे येथील ‘मराठा मोर्चा’ला उन्हाचा फटका बसला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या १५० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. यात महिलांची संख्या सर्वाधिक होती. धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेदेखील सहकुटुंब या मोर्चात सहभागी झाले. राज्यातील अन्य मोर्चाप्रमाणेच या मोर्चातही लाखोंचा समुदाय उतरला. कडक उन्हातही मोर्चेक-यांचा उत्साह कायम होता.तरीही शिवसेना किंवा दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागितलेली नाही.
कोणत्याही वृत्तपत्रात एखादा मजकूर किंवा चित्र आक्षेपार्ह पद्धतीने प्रसिद्ध झाले तर त्याची जबाबदारी स्वीकारून संपादकाने दिलगिरी व्यक्त करण्याची प्रथा आहे. मात्र इथे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांना दिलगिरी व्यक्त करायला लावून स्वत:ची जबाबदारी झटकली आहे. या व्यंगचित्राबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
मात्र त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागण्याऐवजी, कशाची माफी मागायची? म्हणत या निषेध करण्यामागेच राजकारण असल्याचे भासविण्याचा खटाटोप केला आहे.
