ठाणे, भिवंडी, शीळफाटा येथील वाहतूक कोंडीत अडकल्याने शाळेत जायला उशीर
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वसरेवा पूल बंद झाल्यामुळे वळवलेली वाहतूक, एकाच वेळी वाहणारा अवजड वाहनांचा लोंढा आणि रस्त्यांवरील खड्डे यांच्या जंजाळात अडकल्यामुळे ठाणे, कळवा तसेच भिवंडी शहरांतील महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होऊ लागलेल्या या कोंडीचा फटका शालेय विद्यार्थी आणि रुग्णांना सर्वाधिक बसू लागल्याचे चित्र आहे. या मार्गावरून जाणारे अनेक शाळांचे विद्यार्थी कोंडीत अडकत असल्याने वेळेवर शाळेतही पोहोचू शकत नाहीत. ही कोंडी इतकी मोठी होत आहे की, अनेकदा प्रवासी वाहन सोडून पायी मार्गस्थ होताना दिसत आहेत. गुरुवारीदेखील हाच प्रकार पाहायला मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहतूकीचा भार वाढल्याने ठाणे, मुंब्रा, शीळफाटा तसेच भिवंडी शहरातील महामार्गावर सातत्याने कोंडी होऊ लागली आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येत नाही. मात्र, दुपार आणि रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येतो. रात्रीच्या वेळेस शहरात येणारी अवजड वाहनांची वाहतूक सकाळपर्यंत सुरू असते आणि त्यानंतर दुपारी पुन्हा ही वाहतूक सुरू होते. त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर अभुतपुर्व कोंडी होऊ लागली आहे.
या कोंडीचा फटका आता विद्यार्थ्यांना आणि रुग्णवाहीकांना बसू लागला आहे. घोडबंदर भागातील शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी यापूर्वी १५ ते २० मिनीटांचा अवधी लागायचा, मात्र आता त्याच अंतरासाठी एक ते पाऊण तासांचा वेळ लागतो. कळवा परिसरातील दहा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तासांचा वेळ लागतो. तसेच मुंब्रा परिसरातील अर्धा तासांच्या अंतरासाठी एक तासाहून अधिक वेळ लागतो. भिवंडी येथील काल्हेर भागातील १५ मिनीटांच्या अंतरासाठी पाऊण तासांचा वेळ लागतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सकाळ आणि दुपारच्या वेळेत होणाऱ्या कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचविण्यास उशीर होऊ लागला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शाळांमध्ये परिक्षा घेण्यात येतात. परंतु या कोंडीमुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकले नाहीतर त्यांना परिक्षेस मुकावे लागू शकते, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
सकाळी निघालेली बस दुपारी शाळेत
कापुरबावडी परिसरातील एका शाळेत ठाण्यासह भिवंडी परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. याच शाळेतील विद्यार्थ्यांची एक बस पंधरा दिवसांपुर्वी दुपारी कोंडीत अडकली. दोन ते अडीच तासानंतर ती कोंडीतून बाहेर पडली. पण, शाळेत बस पोहचेपर्यंत या विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ झाली होती, अशी माहिती विद्यार्थी वाहतुक संघटनेचे अध्यक्ष मनोज पावशे यांनी दिली. ‘दुपारच्या वेळेत शाळेच्या बसेस दोन फेऱ्या मारतात. पहिल्या फेऱ्यात विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे आणि दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना घरी सोडले जाते. परंतु वाहतुक कोंडीमुळे आता दोन फेऱ्या मारणे शक्य होत नाही. दुपारी दिडच्या सुमारास घरी पोहचणारे विद्यार्थी आता अडीच वाजता घरी पोहचत आहेत,’ असे ते म्हणाले.