उरणमध्ये पाच सशस्त्र संशयित तरुण दिसल्यानंतर सतर्कतेचा इशारा दिला असतानाच ७ सप्टेंबर रोजी उरणजवळ एक संशयास्पद बोट आढळली होती अशी माहिती उघड झाली आहे. या बोटीची चौकशी सुरु असल्याचे राज्यातील गृहखात्यामधील अधिका-यांनी सांगितले आहे. या बोटीचा आणि संशयित तरुणांचा काही संबंध आहे का याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे.
७ सप्टेंबररोजी रायगडमधील मोराजवळ सुरक्षा यंत्रणांना एक बोट संशयास्पदस्थितीत आढळली होती. सुरक्षा यंत्रणांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने समुद्रात बोटीचा पाठलागही केला. बोट जप्त करण्यात यशही आले. पण बोटीत असलेले लोक पसार होण्यात यशस्वी झाले. ही बोट तिथून मुंबईतील माझगावमधील बंदरावर आणण्यात आली होती. या बोटीच्या आतमध्ये टँकही आढळले होते.
गुरुवारी उरणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना पाच सशस्त्र संशयित तरुण दिसले होते. यातील दोघा संशयितांचे रेखाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या घटनेचा आणि सात सप्टेंबररोजी आढळलेल्या बोटीचा काही संबंध आहे का याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. राज्याचे
अतिरिक्त मुख्य सचिव (गृहखाते) के पी बक्षी यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत असे बक्षी यांनी सांगितले. नवी मुंबईकडे येणा-या आणि तिथून बाहेर पडणा-या सर्व रस्त्यांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे बक्षी यांनी नमूद केले.
पोलिसांनी संशयित तरुणांच्या माहितीला गांभीर्याने घेतले नाही या आरोपाचाही त्यांनी इन्कार केला. बक्षी म्हणाले, यात तथ्य नाही. आम्हाला संशयित तरुणांची माहिती सकाळी सात ते आठच्या सुमारास मिळाली. आम्ही तातडीने नवी मुंबईच्या आयुक्तांना सतर्कतेचा इशारा दिला होता असे बक्षींनी स्पष्ट केले.
दरम्यान, शुक्रवारीदेखील उरणमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. पोलीस, नौदलाचे पथक संपूर्ण परिसराचा कसून शोध घेत आहेत. राज्य सरकारने या घटनेसंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडून अहवाल मागवला असून आज माथूर सरकारकडे अहवाल सादर करतील अशी शक्यता आहे. उरणमधील घटनेनंतर राज्यभरातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मुंबईतील विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.