सातत्याने दुष्काळाचा सामना करत असलेल्या मराठवाड्याला परतीच्या पावसाने मोठा दिलासा आहे. पाण्याचे कायम दुर्भिक्ष्य असलेल्या बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. बीडमधील बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसामुळे सोलापूर-औरंगाबाद वाहतूक विस्कळीत झाली आहे. बीड शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. उस्मानाबादमध्ये तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बीडमध्येही रस्ते जलमय झालेस आहेत. बेनेतुरा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने अक्कलकोट-उमरगा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. येथील वाहतूकही ठप्प झाली आहे. मुरूम-बेळंब गावचा संपर्क तुटला आहे. नांदेडमध्ये रेल्वे रूळ वाहून गेल्याचे वृत्त आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हे म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांनाही पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत इथे दमदार पाऊस पडला आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही दिशेने प्रचंड प्रमाणात बाष्पयुक्त वारे येत असल्याने राज्याच्या बहुतांश भागांत पाऊस पडण्याचा अंदाज असून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसात धुळे तालुक्यात वीज कोसळून बुधवारी मध्यरात्री एका तरुणाचा मृत्यू झाला तर अंमळनेर तालुक्यात नदीत पोहोताना एकजण पुरात वाहून गेला.