मोठी परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून भाविक पुण्यात येतात; तसेच शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिकही मोठ्या प्रमाणात येतात. या भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर त्यांना परत आपल्या गावी जाता यावे, यासाठी पीएमपीएमएलने कंबर कसली आहे. पिंपरी विभागातून एकूण 75 बस सोडण्यात येणार आहेत, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून एकूण 622 जादा बस सोडण्यात येणार आहेत.
या जादा गाड्यांना रात्री अकरापर्यंत नियमित तिकीट राहणार असून, रात्री अकरानंतर तिकिटात 25 टक्के वाढ असणार आहे, तर रात्री बारानंतर या जादा गाड्यांसाठी कोणतेही पास चालणार नाहीत. त्यामुळे भाविकांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. प्रवाशांची गर्दी आणि मागणीनुसार या बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 20 पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यानंतर गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पीएमपीच्या हद्दीबाहेरील मार्गांसाठी ही जादा बसची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.