कश्मीरवरील नुसत्या चर्चा म्हणजे शिळ्या कढीला ऊत!

कश्मीरबाबतचे धोरण म्हणजे फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे आणि यावर सुरू असलेल्या चर्चा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चार मोबाईल आरोग्य सेवा वाहिनींचे उद्घाटन झाले, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून ६० पेक्षा अधिक वर्षे लोटली तरी अद्याप कश्मीरबाबत फक्त चर्चा आणि चर्चाच सुरू आहेत. फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात हेच धोरण चालले आहे. हे किती वर्षे चालणार? आणि आता केवळ चर्चा करून शिळ्या कढीला ऊत आणला जातोय, त्यातून साध्य काय होणार? बलुचिस्तानचे काय होते ते बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा उल्लेख केला. यावर पत्रकारांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी आता बलुचिस्तानच्या विषयाला हात घातला आहे. पुढे बघूया काय करतात ते आणि काय होते ते. कोणती पावले पुढे उचलली जातील ते बघावे लागेल. पंतप्रधानांचे हे धोरण योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *