बेपत्ता ‘जय’चा तपास सीआयडी करणार

सुप्रसिद्ध वाघ ‘जय’ कित्येक दिवसांपासून नागपूरजवळील उमरेड अभयारण्यातून बेपत्ता आहे. या ‘जय’ वाघाचे असे एकाकी नाहीसे होणे संशयास्पद आहे. ‘जय’चा मृत्यू झाल्याची किंवा वन खात्यातील अधिका-यांच्या संगनमताने आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीने त्याची शिकार केली असेल, अशी शंका व्यक्त करून वाघ बेपत्ता झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. त्यामुळे वनखात्याची जबाबदारी असलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

खासदार नाना पटोले म्हणाले की, पर्यटकांना आपल्या वैशिष्टय़पूर्ण वागण्याने आपलासा करणारा ‘जय’ पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या ‘जय’च्या प्रेमात पडला होता. या वाघाने सरकारला ४७ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे.

यापूर्वी ‘राष्ट्रपती’ व ‘डांडू’ हे दोन्ही वाघ याच जंगलातून बेपत्ता झाले होते. वन खात्यातील अधिका-यांच्या संगनमताने ‘जय’ची आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीने शिकार केली असेल, असा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *