तलाव भरले, जलाशयांची तहान भागेना

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांत पाणीसाठा वाढल्याने १५ टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. परंतु अद्याप नळाला कमी दाबाने पाणी व दूषित पाणी येत असल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत.

जलशुद्धीकरणानंतर मुंबईला पुरवण्यात येणारे पाणी जलाशयांत जमा केले जाते. परंतु जलाशयांतील पाणी पातळीत वाढ होत नसल्याने पाण्यासाठी बोंब सुरूच आहे. सर्वच भागांत पाणीबाणी निर्माण होत असव्याने शुक्रवारी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

मुंबईतील तलावांमधील पाणीसाठय़ात वाढ झाल्यांनतर तसेच कपात मागे घेतल्यानंतरही कुलाबा भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत असून लोकांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आणत काँग्रेस नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी ६६ (ब)अन्वये सभागृहात चर्चा घडवून आणली. मलबारहिल येथील जलाशयाची पातळी वाढली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचे निदर्शनास आणले. त्याला पाठिंबा देताना विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी २४ तास पाणी देण्याचे जाहीर केले.

त्यानंतर किमान दोन तास पाण्याचा पुरवठा योग्यप्रकारे केला जावा, अशी मागणी त्यांनी केली. खारमध्ये पाण्याच्या तक्रारी वारंवार येत असून जलअभियंता विभागाचे अधिकारी नगरसेवकांचे फोन उचलत नसल्याची खंत काँग्रेस नगरसेविका सुनीता वावेकर यांनी व्यक्त केली. उपमहापौरांच्या मतदारसंघात पाणी चांगले येते, पण बाजूच्या सर्व मतदारसंघात पाण्याची बोंब आहे, अशी टीका भाजपावर केली.

जलअभियंता विभागातील तज्ज्ञ व अनुभवी अधिका-यांची बदली अन्य विभागांत केल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे काँग्रेस नगरसेवक मोहसीन हैदर यांनी सांगितले. जुन्या अधिका-यांना पुन्हा जलअभियंता विभागात आणा, अशी मागणीही त्यांनी केली. सध्याच्या अधिका-यांना जलव्यवस्थेचीच माहिती नसल्याने केवळ जलाशयाची पातळी समपातळीत नसल्याचे कारण देत ते मोकळे होतात, असेही त्यांनी सांगितले.

दादरमधील किर्ती कॉलेज, कामगारनगर आदी भागांमधील झोपडपट्टी व इमारतींमध्येही कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारींकडे मनसे नगरसेविका सीमा शिवलकर यांनी लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत वकारूनिस्सा अंसारी, कमरजहाँ सिद्धिकी, नौसिर मेहता, भालचंद्र आंबोरे, आसिफ झकेरिया, अजित भंगारी, याकूब मेमन आणि नूरजहाँ सिद्धिकी यांनी भाग घेत विभागातील पाण्याच्या तक्रारींविरोधात आवाज उठवला. यावेळी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी मलबार हिल जलाशयातील पाणीसाठा उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे स्पष्ट करत सर्व विभागातील पाण्याच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *