सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारपुढे नांगी टाकली. अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे, असा ठराव सभागृहात आणण्याची तयारी सुरू असताना त्यावर शिवसेनेच्या सदस्यांनी सही करण्यास नकार दिल्याने त्यांचा ढोंगीपणा उघड झाला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याने ‘‘वाघाची झाली शेळी’’ असा हल्लाबोल विरोधकांच्या वतीने सभागृहात केला. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे झाले.
महाराष्ट्राचे तुकडे करून वेगळा विदर्भ करण्याचा अशासकीय ठराव भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत आणला आहे. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही योग्य वेळी विदर्भ महाराष्ट्रापासून तोडून वेगळे राज्य केले जाईल, अशी घोषणा केली. त्यावरून सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळात जोरदार रणकंदन सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवसेनेनेही भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
मंगळवारीच शिवसेनेच्या एका सदस्याने या प्रश्नावर सभागृहात वेलमध्ये उतरून राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे सदस्य विधिमंडळात आणि बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत होते. दोन्ही सभागृहाचे कामकाज बुधवारी सकाळी सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या दोन्ही सभागृहांतील आमदारांनी विधानसभेच्या भाजपाच्या आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ज्या आमदारांनी वेगळय़ा विदर्भाच्या घोषणा अखंड महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिल्या त्या आमदारांना निलंबित करावे, अशा घोषणा पायाऱ्यांवर उभे राहून शिवसेनेचे आमदार देत होते. मात्र प्रत्यक्ष सभागृह सुरू झाले तेव्हा शिवसेनेच्या सदस्यांनी नांगी टाकली.
अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर बुधवारी सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक घडामोडींना वेग आला होता. सभागृहात सरकारच्या वतीने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केली जात नसल्याने अखंड महाराष्ट्राचा ठराव सभागृहात आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हालचाली सुरू झाल्या. अखंड महाराष्ट्राचा ठराव आणला जात असताना त्यांना शिवसेनेचेही समर्थन मिळावे, यासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेतली.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही दूरध्वनीवर संपर्क साधला. विरोधी पक्षांच्या ठरावावर तुम्हाला सही करायची नसेल तर शिवसेनेने अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणावा, त्याला विरोधी पक्षांचे सदस्य पाठिंबा देतील, असेही सांगण्याचा प्रयत्न झाला. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तर राष्ट्रवादीच्या वतीने दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील उपस्थित होते.
पक्ष म्हणून आपले विचार वेगळे आहेत. मात्र अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर तुमचे आणि आमचे एक मत आहे. तेव्हा अखंड महाराष्ट्राचा ठराव सभागृहात चर्चेला यावा, त्यासाठी आपण ठरावावर सही करावी, असे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी सही करण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेचे अखंड महाराष्ट्राचे प्रेम हे बेगडीच असल्याचे स्पष्ट झाले. वाघाची शेळी झाली, अशी चर्चा विधान भवन परिसरात सुरू होती.