‘शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे पुढच्या वर्षी हलके

‘शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे पुढच्या वर्षी हलके

‘शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात स्थापन केलेली समिती आपला अहवाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात देणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून पुढच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१६) दप्तरांचे ओझे कमी करण्यात येईल,’ असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

सायन येथील ‘शिव शिक्षण संस्थे’च्या ७५व्या वर्षा​निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तावडे म्हणाले, ‘शालेय अभ्यासक्रम शिकवत असताना विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण कोणते आहेत, याची ओळख ‍शिक्षकांना असणे आवश्यक आहे. ते गुण ओळखून त्या पद्धतीचे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत विचार करण्यात येईल. यामुळे तो विद्यार्थी भविष्यात स्वत:च्या पायावर उभा राहू शकेल.’

तसेच राज्यातील शिक्षणपद्धतीमध्ये आणि परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शिक्षण तज्ज्ञांबरोबर आपली चर्चा सुरू असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांना नुसते घोकंपट्टीचे शिक्षण न देता त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, तो विद्यार्थी एखाद्या विषयाचा व्यापक विचार करू शकेल, अशी शिक्षणपद्धती सुरू होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिव शिक्षण संस्थेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या विशेष फिटनेस उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि मल्लखांबचेही प्रात्यक्षिकही सादर केले.

समितीचे स्वरूप

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती नेमली आहे. या समितीत एकूण ११ सदस्य आहेत. त्यापैकी पाच सदस्य मानसोपचार तज्ज्ञ; तर इतर अन्य विषयांतले तज्ज्ञ आहेत. राज्यभरातील आठ शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारीतल्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या आर्थिक स्तरांच्या शाळांमध्ये ही समिती पाहणी करणार आहे. राज्यभर दौरा करण्यासाठी समितीच्या तीन-तीन सदस्यांचे गट केले जाणार आहेत. आतापर्यंत समितीच्या चार बैठका झाल्या आहेत. ग्रामीण, शहरी, निमशहरी अशा सर्व आर्थिक, सामाजिक गटांचा विचार करून सर्वसमावेशक शिफारशी सुचवल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *