कोकणातील रस्त्यांची सध्या चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना गणपतीच्या दर्शनासाठी कोकणात बोलवावे, ही तमाम सिंधुदुर्गवासीयांची इच्छा आहे. पण चंद्रकांतदादा पाटील तुम्हाला बोलावले, तर तुम्हाला खड्ड्यातून मार्ग काढावा लागेल. त्यामुळे प्रथम कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश द्या, अशी कोपरखळी मारत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कोकणातील खड्ड्यांबाबत थेट विधानसभेत आवाज उठवला.
कोकणचे वैभव असलेल्या गणपती उत्सवासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असतात. या उत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईप्रमाणेच कोकणातील रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील दुभाजकांची पडझड झाली असून गतिरोधक आणि झेब्राक्रॉसिंगची अवस्थाही वाईट आहे. त्यामुळे कोकणातील रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी कोकणातील काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी उपप्रश्नाद्वारे कोकणातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सत्ताधा-यांना धारेवर धरले.
गणपतीच्या दर्शनासाठी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना बोलवावे, ही कोकणवासीयांची इच्छा आहे. पण रस्त्यांची अवस्था पाहिली की, चंद्रकांतदादा मला तुमची काळजीच अधिक वाटते. खड्ड्यातून मार्ग काढताना तुमचे कंबरडे मोडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश चंद्रकांतदादांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला द्यावेत, अशी मागणी नितेश राणे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
यावर आश्वासक उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत, हे मान्य आहे. गणपतीअगोदर सर्व ठिकाणचे खड्डे भरून काढले जातील, असे आदेश संबंधित विभागांना देण्यात येतील.”