मराठी शाळांना आले अच्छे दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटसंख्येची सहा वर्षांपूर्वी दयनीय अवस्था होती. मुलांना शिकविण्यासाठी पालकांनी इंग्रजी शाळांचा ध्यास घेतला होता. गरजू व गरीब मुलांचीच मराठी शाळा राहिली होती. परंतु आज कुशल शिक्षकांनी मराठी शाळांना ङ्गअच्छे दिनफ आणल्याचे चित्र दिसत आहे.

सुपा परिसरात सुपा बाजारतळ, कोल्हे वस्ती, जांभूळवाडी, शहाजापूर, पवारवाडी, डोंगरवाडी, वाड्या व वस्त्यांचा समावेश आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस, गटशिक्षणाधिकारी के. एल. पटारे यांच्या मार्गदर्शनातून तीन वर्षांपासून सुपा केंद्रातील शाळा डिजीटल झाल्या. सांस्कृतिक कार्यक्रम, कराटे, योगासने, मंथन परीक्षा, फिरोदिया मेरिट फाऊंडेशन परीक्षा, मुलांचे वाढदिवस, प्रश्‍नमंजुषा, ज्ञानप्रबोधिनी, वृक्षारोपण, लेझीम पथक, जादा क्लाससारख्या उपक्रमांमुळे मराठी शाळा प्रकाशझोतात आली. पालक मेळाव्यातून शिक्षकांची गुणवत्ता व कुशलता ग्रामस्थांना समजली. सुपा परीसराच्या शाळेतून मंथन परीक्षेत, फिरोदिया मेरिट फाऊंडेशन परीक्षेत 10 विद्यार्थी राज्यपातळीवर चमकले. जिल्ह्यातही 12 विद्यार्थिनी परीक्षेत बाजी मारली. पाच वर्षांत स्कॉलरशीपसाठीही निवड झाली. मराठी शाळेतून हायस्कूलला गेलेल्या मुलांची बुध्दिमत्तेची परीक्षा झाली. गुरूकुल प्रवेशासाठी 60 विद्यार्थ्यांमधून 30 विद्यार्थी मराठी शाळेची उत्तीर्ण झाली. चार वर्ष इंग्रजीत शिकणार्‍या एकाही विद्यार्थ्याची गुरूकुल प्रवेशासाठी निवड झाली नाही. मराठी शाळेचा बुध्दिमत्तेचा स्तर शिक्षकांनी इंग्रजी विद्यार्थ्यांच्या पालकांना दाखवून दिला आहे.

कोल्हे वस्तीच्या मराठी शाळेत दोन वर्षांपासून ओरीसा राज्यातून एक विद्यार्थी शिकण्यासाठी दाखल झाला. विद्यार्थ्याचे आई-वडील मजुरी काम करीत आहे. एस. एस. ढोरजकर या शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परिश्रम घेतले. आरोसा विद्यार्थी मराठी भाषेत बोलू, लिहू लागला व चांगल्या गुणांनी तिसरी इयत्तेत उत्तीर्ण झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहांजापूर गावच्या शाळेची अवस्था वाईट होती. पालकांनी इंग्रजी शाळेचा आधार घेतला होता. विद्यार्थी पटसंख्या 13 होती. शिक्षिका जे. एम. कुर्‍हाडे यांनी पालकांमध्ये समन्वय घडवून आणला. पाचवी इयत्तेचा वर्ग सेमी केल्याने मराठी शाळा उर्जितावस्थेत आली. विद्यार्थी पटसंख्या 25 झाली आहे. कुर्‍हाडे शिक्षकांचा ग्रामस्थांनी गौरव केला आहे.

जांभुळवाडी प्राथमिक शाळा अडचणीची ठरली होती. पाच वर्षांपूर्वी विद्यार्थी पटसंख्या 17 होती. आज विद्यार्थी पटसंख्या 115 झाली आहे. शिक्षक संतोष मगर यांच्या सद्गुणामुळे ग्रामस्थांकडून इमारत निधी 5 लाख गोळा केला. पालकवर्गाकडून 3 लाखांची देणगी मिळविली. 115 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी इंग्रजी शाळेला बायबाय करून मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे. जांभुळवाडी मराठी शाळेत औद्योगिक वसाहतीतील कामगार, मजुरांच्या मुलांनी शिक्षणासाठी सातत्य मिळविले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुप्याच्या शाळेत सात सवाष्णींचे महिलाराज आहे. महिला शिक्षकांनी गावात, पालकांना सेमी इंग्रजी मराठी शाळेत असल्याचे महत्त्व पटवून दिले. भटक्या जातीतील 27 विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला. चालू शैक्षणिक वर्षात 75 विद्यार्थी पटसंख्या झाली आहे. जांभुळवाडी, पवार वाडी मराठी शाळांना आयएसओ मानांकर मिळाले. मुख्याध्यपक गट, शिक्षिका ज्योती कोल्हे, स्वाती कडूस, ज्ञानेश्‍वर इंगळे, रसाळ या शिक्षकांनी पालकवर्गाला नवा मंत्र दिला व राज्यपातळीवर विद्यार्थी चमकले. इंग्रजी शाळेची भरमसाठ फी घेऊन मुले घडविली जात नसल्याचे मराठी शाळेच्या शिक्षकांनी प्रत्यक्षदर्शी दाखवून दिले आहे. पालकवर्गालाही प्रत्यक्ष प्रत्यय आला आहे. मराठी शाळांची गुणवत्ता वाढल्याने परिसराच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्या दुपटीने-तीपटीने वाढली आहे. मराठी शाळांना अच्छे दिन आल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *