तालुक्यातील लेहा गावात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या एका महिलेचा पंधरा दिवसानंतर शनिवारी मृत्यू झाला आहे. या महिलेचा औरंगाबाद येथे उपचार घेत होते.
लेहा येथील सुरय्याबी रहेमानखाँ पठाण (वय,५६) यांना पंधरा दिवसापूर्वी गावातीलच पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. लेहा येथे मागील काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मागील दोन महिन्यांत महिलांसह लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी सुरय्याबी पठाण यांच्या कानाला या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले असले तरी त्यांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात एक मुलगा असून यापूर्वी गावात लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी तर आपल्या पाल्यांची शाळा देखील बंद केली आहे, असे असताना ग्राम पंचायत मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
एकाच दिवशी अनेकांना चावा
दरम्यान या पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी अनेकांना चावा घेतला आहे या मध्ये नुकतेच निधन झालेल्या सुरय्याबी पठाण यांच्यासह सरस्वतीबाई नारायण सोनोने, गावातीलच मुलगी आणि सेलुद येथील एका वृद्धाला चावा घेऊन कुत्र्याने जखमी केले होते.