परदेश दौ-यावरून परत आल्यानंतर मोदींना काश्मीर पेटल्याचे माहीत झाले असावे, त्यामुळे मायदेशी आल्यावर काश्मिरात शांतता नांदावी, असे आवाहन तब्बल पाच दिवसांच्या दंगलीनंतर केले आणि या देशात आल्यावर ते जागे झाले. रोम पेटले असताना फिडल वाजवणा-या नीरोसारखी मोदींची अवस्था झाल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
आफ्रिकेच्या पाच दिवसांच्या दौ-यानंतर मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या वेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित होते. या बैठकीत मोदी यांना काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांचे तपशीलवार विवेचन देण्यात आले.
राज्यातील परिस्थितीबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली. काश्मिरी जनतेने शांतता बाळगावी. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकेल. काश्मीरमधील निरपराधांची कोणतीही हानी होऊ नये. राज्य सरकारला कोणतीही मदत लागल्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान हे परदेशात असतानाही काश्मीरमधील परिस्थितीची माहिती घेत होते. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी याबाबत बैठक घेतली.
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व तेथील जनजीवन सामान्य होण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती केंद्रीय सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी मंत्र्यांना दिली. अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी, असे आदेश सर्व सुरक्षा दलांना दिले आहेत.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाने काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण आढावा घेतला आहे. गरज पडल्यास लष्कर दिमतीला देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
२४ ठार, ३५० जखमी
काश्मीरमध्ये चार दिवस सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २४ जण ठार झाले असून ३५० जण जखमी झाले आहेत. राज्यातील चार जिल्ह्यात संचारबंदी कायम आहे.
प्रसारमाध्यमांवर पंतप्रधान नाराज
हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणी या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याची ‘हीरो’ची प्रतिमा रंगवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. वाणी हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. देश फोडण्यासाठी तो काम करत होता. वाणी याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत, तरीही त्याला ‘हीरो’ करण्याचे काम सुरू आहे, याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त केली.