रायगड जिल्ह्य़ात मागील तीन दिवसांत पावसाचा जोर कायम

रायगड जिल्ह्य़ात मागील तीन दिवसांत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्य़ात ४५ टक्के क्षेत्रात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. काही भागात शेतात पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजली. तेथे दुबार पेरणी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्य़ात यंदाच्या खरीप हंगामात  १ लाख, २३ हजार, ७०० हेक्टरवर भात पीक घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मुसळधार पावसाने रायगडला झोडपून काढले होते. शेतात पाणी साचल्यामुळे लावणीची कामे खोळंबली होती. मागील तीन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आहे. शेतात साचलेले पाणी कमी झाल्यामुळे लावणीच्या कामाला वेग आला आहे. ४५ टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. सुमद्राला आलेली भारती व त्याच वेळी पडलेला पाऊस. यामुळे आलिबाग, पेण, मुरुड, रोहा या तालुक्यांमधील काही भागात शेतामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे भाताची रोपे काही प्रमाणात कुजली होती. परंतु शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून भाताची नवीन रोपे तयार केली. ती चांगल्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती रायगडचे अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी दिली. जिल्ह्य़ात  दरवर्षी सरासरी ३ हजार मीमी पावसाची नोंद होत असते. या तुलनेत जुल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत जिल्ह्य़ात सरासरी १,१९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने भात लावणी पूर्ण करण्यासाठी ही चांगली वेळ असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *