शहरासह तालुक्यात संततधार सुरूच आहे. शहरात मध्यरात्री भरलेले पाणी सकाळनंतर ओसरले. पावसाच्या जोरामुळे तालुक्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले. गेल्या चोवीस तासात तालुक्यात 166.22 मिमी व एकूण 1700.74 मिमी पावसाची नोंद झाली.
तालुक्यातील कादवड येथील संतोष शिंदे व आकले येथील सुभाष निकम, मोरवणे येथील परशुराम शिंदे यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. शहरालगतच्या धामणवणे येथील संतोष पिटले यांचे घर कोसळून 30 हजारांचे नुकसान झाले. सायंकाळी परशुराम घाटात झाड पडले होते; मात्र त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. शहरालगतच्या खेर्डी रेल्वे पुलाशेजारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पुलाशेजारील रस्ता पाण्याखाली गेला होता. सखल भागात पाणी साचल्याने काहींच्या घरांना पाण्याने वेढले होते. सकाळी पावसाचा जोर असल्याने काही कंपन्यांनी कामगारांना सक्तीची सुटी दिली होती. शहरातील पुराचे पाणी सकाळनंतर ओसरले होते; मात्र मुरादपुरात विविध ठिकाणी पुराचे पाणी ओसरले नव्हते. बाजारपेठ, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली.
खानापूर, गोर्हे खुर्द, सोनापूर, सांगरूण आदी ठिकाणचे शेतकरी आज धरण फुटीच्या आठवणींंना उजाळा देत आहे. खडकवासला, शिवणेगाव, नांदेड, हिंगणे खुर्द, वडगावखुर्द आदी ठिकाणी पानशेत धरणफुटीच्या आठवणींना येथील वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर शहारे येत आहेत. जुलै 1961 मध्ये पडलेल्या अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस त्यानंतर झालेला नाही.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे पानशेत धरण शंभर टक्के भरलेले नाही. सध्या पानशेत धरणात 41 टक्के इतकेच पाणी आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर 1 जुलैपासून पानशेत धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. 1961 मधील जुलै महिना साखळी जोरदार अतिवृष्टी सध्या धरण क्षेत्रात नसली तरी अतिवृष्टीच्या धास्तीने आजही येथील वयोवृध्द शेतकरी महापुराच्या कहाण्या सांगतात. त्यामुळे या घटनेची आठवण जिवंतच राहते.
मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरी नाशिक व ठाणे जिल्ह्यांत विशेषत: तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यात असलेल्या अप्पर वैतरणा तलावात गेल्या 24 तासांत 182 मि.मी. पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. मध्य वैतरणा तलाव क्षेत्रातही 106 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर मोडक सागर व तानसा या प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही अनुक्रमे 84 मि.मी. व 40 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्या भातसा तलावात मात्र 24 तासांत अवघा 28 मि.मी. पाऊस झाल्याचे जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठा 2 लाख 99 हजार दशलक्ष लीटर्सवरून थेट 5 लाख 3 हजार 69 दशलक्ष लीटर्सवर पोहोचला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावात 14 लाख दशलक्ष लीटर्स पाणी साठवण्याची क्षमता आहे. आतापर्यंत केवळ 36 टक्के तलावात पाणीसाठा झाला आहे. किमान 80 टक्केपेक्षा म्हणजे 9 ते 10 लाख दशलक्ष लीटर्स पाणीसाठा जमा होत नाही, तोपर्यंत पाणीकपातीचा निर्णय मागे घेणे शक्य नसल्याचेही सांगण्यात आले.