उत्तराखंडमध्ये पुरग्रस्त भागात बचावकार्यादरम्यान जवानांनी महिलेला जिवंत बाहेर काढलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिला गेल्या दोन दिवसांपासून ढिगा-याखाली होती. पिठोरागड जिल्ह्यात ढगफुटीने कहर केला असून पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक लोक घराखाली जिवंत गाडली गेली आहेत. आसाम रायफल्स रेजिमेंट आणि भारतीय लष्कराचे जवान बचावकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याच बचावकार्यादरम्यान महिलेला जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आलं आहे.
पिठोरागडमधील बस्ताडी गावात ही महिला आपल्याच घराच्या ढिगा-याखाली अडकली होती. खुप वेळ चाललेल्या बचावकार्यानंतर तिला जवानांनी जिवंत बाहेर काढलं. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केलं आहे अशी माहिती जिल्हा व्यवस्थापन अधिकारी आर एस राना यांनी दिली आहे. महिलेला बाहेर काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. भारतीय लष्कराच्या फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ टाकण्यात आला असून 2 लाख 13 हजार लोकांनी आतापर्यंत तो पाहिला आहे.
उत्तरा खंडमधील पिठोरागड आणि चमोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून, तिथे किमान ३0 जणांचा मृत्यू झाला आहे. भुईसपाट झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबून मरण पावले असावेत, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ते दबून मेले आहेत वा वाहून गेले आहेत.
या प्रकारांमुळे उत्तराखंडातील लोकांमध्ये घबराट पसरली असून, दोन वर्षांपूर्वी अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते झाले होते, तसेच आताही होते की काय, अशी शंका त्यांना वाटत आहे. ढगफुटी आणि जोरदार पावसामुळे अलकनंदा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून, अनेक भागांत पुरामुळे घरे पाण्याखाली गेली आहेत. रस्तेही अनेक ठिकाणी खचले असून, तेथील राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनुसार, पिठोरागड जिल्ह्याच्या सिंघली भागात ढगफुटीमुळे ८ लोक मृत्युमुखी पडले, तर २५ जण बेपत्ता आहेत.
मदतकार्यासाठी केंद्रीय पथके रवाना
केंद्राने उत्तराखंडमधील बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके शुक्रवारी रवाना केली असून, या राज्याला आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याची ग्वाही दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. परिस्थिती हाताळण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी रावत यांना दिली.एनडीआरएफची काही पथके आपत्तीग्रस्त भागात पाठविण्यात आली असून, आणखी काही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे राजनाथसिंह यांनी रावत यांना सांगितले.
