भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा बैठकीत एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वावर थेट हल्ला केल्यामुळे एकनाथ खडसे आता बंड करण्याच्या पवित्र्यात आहेत, अशी चर्चा पक्षाच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.
जळगाव जिल्हा भाजपाचा हा मेळावा हरदास मंगळ कार्यालय येथे झाला असताना शहरातील सगळय़ात मोठे मंगल कार्यालय असलेले, कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीने तुडुंब भरलेले होते. खडसे काय बोलणार याची सगळय़ात मोठी उत्सुकता असताना त्यांच्या भाषणानंतर सगळीकडे फटाफट संदेश फिरू लागले. यामध्ये खडसे यांना धमकी देणारा एक विलक्षण संदेश फिरला..
‘सांभाळून बोल एकनाथ
नाही तर तुझा होईल गोपीनाथ’
या संदेशाची चर्चा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली होती. खडसे यांना धमकी देणा-या या संदेशाबद्दल भाजपामध्ये उलटसुलट मतप्रवाह सुरू आहेत. खडसे यांच्या समर्थकांनीच हा संदेश दिला असावा का? असेही या संदर्भात बोलले जात आहे. मात्र खडसे आक्रमक झाले असून, पक्षात बंड होण्याची मोठी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष विजय वाघ यांनी असे संकेत दिले आहेत की, नाथभाऊंना ही धमकी देणारा कोण? याचा शोध घेतला जाईल. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी या सर्व परस्पर हाणामारीबद्दल संताप व्यक्त केलेला आहे. जळगाव जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री होते. त्या काळात दोन्ही मंत्र्यांनी एकत्र अशी एकही बैठक गेल्या १८ महिन्यांत घेतलेली नाही आणि जिल्ह्याच्या विकासाची एकत्रितपणे कधीही चर्चा केलेली नाही. दोन्ही मंत्र्यांच्या पक्षातील दोन गटांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामध्ये पक्षाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, एका गटाने खडसे यांचे निवेदन टेप करून ते दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही ही टेप पोहोचवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जळगाव जिल्हा भाजपा फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.